Monday, 23 July 2018

त्र्याऐंशी गुलाबफुलांचं तुझं गणित
कधी समजलंच नाही मला.

आम्ही  मोजत रहायचो
दररोज द्विगुणित होत जाणाऱ्या कळ्यांची संख्या
आणि उमलण्यासाठी उरलेले दिवस....
तू हसून म्हणायचीस,
"नसतात मोजायचे असे दिवस...
खूप जड जाते मग नेहमीची अवस "

हळू ... हळू.. थोडं सावकाश असं म्हणता म्हणता
एके दिवशी भरगच्च बहरुन उभं राहिलं तुझं झाड
जणू काट्याकाट्यालाही आली होती उर्मी
फूल बनून बहरण्याची

लोक म्हणायचे, "बाईच्या दारी मरणपीक आलंय "

आठवत नाही खरं तेव्हा कुणी गेल्याचं

पण त्र्याऐंशी गुलाबफुलांचं ताट
जेव्हा ओसंडून वाहिलं होतं पडवीत
तेव्हा घटा घटा  पाणी प्यायलीस
तांब्याभर...
आता उभं तुझंच झाड... उरलेल्या काट्यांसकट
मूकपणे छाटून टाकलेस
निरर्थक मागे उरलेल्या देठांचे सरळसोट स्तंभ
कारण ठाऊक होतं त्या झाडासारखंच तुलाही,
आता फक्त न उमलणाऱ्या कळ्यांचेच
चढतील साज... येत्या काही वर्षात

तुझी गुलाबाची त्र्याऐंशी फुलं
आणि माझ्या तळहातावरील एक वर्ष ओलं
जेव्हा उडून गेले घालून हातात हात
तेव्हा उघडा पडलेला तुझ्या डोळ्यांचा कोरडा तळ
आणि माझ्या तळहातावरील भळभळतं दव
सारं काही आठवतं,

पण खरंच नाही आठवत...
त्यावर्षी कुणी गेल्याचं ...!


No comments:

Post a Comment