Sunday, 25 March 2018

नैतिक मूल्यविचाराच्या क्षेत्रात धर्माची मक्तेदारी एवढी प्रबळ आहे, की जीवनविषयक विवेकनिष्ठा आणि नैतिकतेचा भावार्थ इतर दृष्टिकोनातून स्पष्ट करणे महाकठीण कर्म होऊन बसले आहे. नीतिशास्त्रावर कब्जा करून धर्माने नैतिकता जणू माणसाच्या विरुद्ध असलेल्या अस्त्रासारखी वापरली त्याचप्रमाणे भाषेतल्या सर्वोच्च नैतिक संकल्पनाही पार्थिवाच्या पलीकडे, माणसाच्या पोहोचेपलीकडे नेऊन ठेवल्या. 'उत्कट अनुभव ' येण्याची भावस्थिती हि केवळ पारलौकिक तत्वाचे ध्यान करतानाच प्राप्त होते, असेच गृहीत धरले जाऊ लागले. 'पूजा' याचा अर्थ  केवळ माणसापेक्षा कुणातरी वरच्या शक्तीला श्रद्धेने निष्ठा वाहणे असाच घेतला जाऊ लागला. 'श्रद्धा' म्हणजे केवळ गुढगे टेकून, माथा लववून कुठल्याशा पवित्र समजल्या जाणाऱ्या गोष्टीचा आदर करणे असे ठरवूनच गेले. जे जे काही मानवाच्या ऐहिक जीवनाचा स्पर्श नसलेले असते तेच 'पवित्रः' असे सर्वानी मान्य करून टाकले.
पण या संकल्पना अखेर खरोखराच्याच भावनांना शब्द देणाऱ्या संकल्पना आहेत.... पारलौकिक असे काहीही अस्तित्वात नसतानाही त्या खऱ्याच असतात. या भावना अनुभवताना खरोखरच उदात्त उत्कट वाटते. धर्मश्रध्दांना अपेक्षित असल्यानुसार स्वतःला क्षुद्र लेखले नाही तरीही हे अनुभव येऊ शकतात. मग या भावनांचा उद्गम किंवा संदर्भ वास्तवात कुठे होत असतो? आदर्श नैतिक मूल्यांशी निष्ठा वाहताना येणारा हा भावनिक अनुभव माणसाला येतोच. आणि तरीही केवळ धार्मिक अनुभवांव्यतिरिक्त या भावानुभवांना काहीच ओळख नाही, परिभाषा नाही, शब्दच नाहीत. 
गूढवादाच्या धुराळ्यातून मानवी भावानुभवांच्या या सर्वोच्च पातळीला बाहेर काढणे गरजेचे आहे. त्या अनुभवांचा संबंध केवळ एकाच गोष्टीशी आहे हे सांगितले गेले पाहिजे - तो संबंध आहे मनुष्यत्वाशी. याच अर्थाने, याच भावार्थाने आणि उद्देशाने, याच जीवनहेतूने मी 'फाउंटनहेड' मधील मनुष्यपूजेचे नाट्य उभे केले आहे.
ही भावना फार कमी, फार मोजक्या लोकांना अनुभवता येते. मानवी जीवनातील उदात्तता काहींना अगदी क्षणकाळ पेटून विझलेल्या ठिणगीसारखी जाणवते... त्यातून काहीच परिणाम सध्या होत नाही. काहींना मी कशाबद्दल बोलतेय तेच कळणार नाही. काहीजण केवळ ठिणग्या विझवण्याचेच कार्य अंगीकृत असल्यासारखे , धर्मोपदेशातील निस्वार्थ सेवावड, वावरतात.
मनुष्य-पूजा म्हणजे नेमके काय, याबद्दल वैचारिक गोंधळ नको. धर्माच्या पकडीतून नैतिकता सोडवून तिला निधर्मी निधर्मी स्वरूप देण्याच्या नावाखाली अतिशय अविचारी, अविवेकी स्वरूप देण्याचे अतिशय गर्हणीय काम होते आहे. उदाहरणार्थ, आधुनिक समूहवादाचे विविध प्रकार (साम्यवाद, फॅसिसम आणि नाझीवाद वगैरे. ) , धर्मोपदेशातील निःस्वार्थ सेवावाद जसाच्या तास ठेवतात आणि केवळ देवाच्या  ऐवजी समाजाची पूजा करायला शिकवतात. आधुनिक तत्वज्ञानातील अनेक पंथ असे आहेत, जे वास्तवाची ओळख विसरून वास्तव म्हणजे सातत्याने बदलणारा प्रवाह आहे असे प्रतिपादन करतात. यात ते चमत्कारांनाही स्थान देतात आणि माणसाच्या किंवा समाजाच्या लहरींनाही स्थान देतात. हे नवं-गूढवादाचे अनुयायी मनुष्यपूजा नव्हे तर मनुष्यजीवनाचा अतिशय वाईट पद्धतीने अधिक्षेप करतात. त्यांच्या धर्मवादी पूर्वसूरींपेक्षा अधिक कडवा अधिक्षेप.
मानवी अस्तित्वाचा अधिक्षेप करण्याची सर्वात वाईट पद्धत म्हणजे आजकालच्या आपल्या (काँक्रीट-बाउंड) मूल्यविचार न करता केवळ समोर जे दिसते त्याचा विचार करणाऱ्या, सांख्यिकीविचार करणाऱ्या बुद्धिवाद्यांची. मानवी प्रेरणांची ताकद ओळखण्याची क्षमताच  नसल्यामुळे ते घोषित करून टाकतात की, मनुष्य हा पूजेयोग्य असूच शकत नाही, कारण - असली उदाहरणं आम्हाला तरी कुठे दिसली नाहीत बुवा!
मी म्हणते आहे त्या अर्थाने ज्यांना माणसातील अत्युच्च क्षमतेचे भान असते तेच केवळ मनुष्यपूजक असू शकतात, आणि ती पूजा प्रत्यक्षात उतरावी म्हणून ते प्रयत्न करीत राहतात. मनुष्य-द्वेष्टे  असतात ते, जे माणसाला असहाय्य, नीतिभ्रष्ट आणि तुच्छ पशुसं मानतात आणि माणूस या वर्णनातून कधी बाहेर पडणारच नाही अशीच काळजी घेत राहतात. माणसाला मानवजातीबद्दल जे ज्ञान होते ते स्वतःच्या माध्यमातून प्रथम होते हे इथे लक्षात ठेवायला हवे.
या दोन ध्रुवांमधील सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे की एका प्रकारच्या विचारसरणीत मानवाच्या आत्मगौरवाची उत्कट अनुभूती आणि त्याच्या पृथ्वीतलावरील आनंदासीद्धीचे पावित्र्य यासाठी परमनिष्ठा वाटते. आणि दुसऱ्या बाजूला या दोन्ही गोष्टी अशक्य व्हाव्यात या दृष्टीने काम करण्यासाठी परमनिष्ठ असते. बहुसंख्य मानवजात आपली सर्व मानसिक शक्ती आणि जीवन या दोन ध्रुवांमध्ये लोम्बकळत घालवते. नेमका प्रश्न आपल्याला कधी समजूच नये यासाठी जीव पाखडते.

आयन रँड
फाउंटनहेड या कादंबरीच्या पंचविसाव्या वर्षाच्या विशेष आवृत्तीसाठी लेखिकेची प्रस्तावना

Saturday, 24 March 2018

मी जी उदात्तता एक छद्म आभास म्हणून रंगवतो ती मला प्रत्यक्षात पाहायची आहे. सत्यात उतरलेली, माझया जिवंतपणी , माझ्या जगण्यात. ती आकांक्षा असलेलं आणखीही कुणीतरी, कुठेतरी अस्तित्वात आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. नाहीतर मग ते स्वप्न पाहण्यात , आणि काहीतरी अशक्य असं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतःला जाळत राहण्यात काय अर्थ आहे ? आत्म्यालासुद्धा इंधन लागतं. ... नाहीतर आत्माही कोरडाठाक पडून मृत होऊ शकतो.

आयन रँड